पुणेSushma Andhare On Devendra Fadnavis :नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मलिक अल्पसंख्याक असल्यानं फडणवीस यांची भूमिका बदलली आहे का, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी मलिक यांच्यावरुन महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महायुतीत बिघाडी ? : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं चित्र विधिमंडळ अधिवेशनात पाहायला मिळालं. त्यामुळं राज्यात चांगलाचं गदारोळ सुरू आहे. मात्र, मलिकांनी कोणाला पाठिंबा दिला, याबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं मलिक नेमके कोणत्या गटात आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळं त्यांना महायुतीत सहभागी करता येणार नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली.