महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरच्या के. के. रेंजमध्ये युद्धाचा थरार; रणगाड्यांनी शत्रू चौक्यांच्या उडवल्या ठिकऱ्या - warland

अहमदनगर येथील के के रेंज या लष्कराच्या भूमीवर तब्बल २ तास युद्धाचा सराव रंगला. यामध्ये अवाढव्य रणगाडे, टेहळणी करणारे लष्कराचे हेलिकॉप्टर, कानठळ्या बसवणारा तोफांचा मारा, गोळीबार तर मध्येच धुरांचे लोट असा हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर चालणारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांतून प्रत्यक्षात पाहायला मिळाला.

pune

By

Published : Feb 11, 2019, 10:27 PM IST

पुणे - फायर...! म्हणताच रणगाड्यांची तोफ लक्ष्याच्या दिशेने वळली आणि क्षणार्धात कानठळ्या बसवणारा आवाज होऊन आगीचे लोळ चमकले..डोळ्याची पापणी लावते न लावते तोच ३ ते ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लक्ष्याच्या दिशेने जाणारा तोफगोळा दिसला आणि काही समजण्याच्या आत लक्षाच्या ठिकऱ्या उडून तिथे आगीचा डोंब उसळला. तर दुसऱ्या ठिकाणी मशिनगनमधून होणाऱ्या बेछूट गोळीबाराचा आवाज.. शत्रूवर तुटून पडलेले भारतीय सैनिक आणि मिशन पूर्ण झाल्यानंतर अभिमानाने फडकलेला तिरंगा, अशा चित्तथरारक प्रसंगाची अनुभती आज नागरिकांना के के रेंज येथील लष्करी युद्धभूमीवर घेता आली.


अहमदनगर येथील के के रेंज या लष्कराच्या भूमीवर तब्बल २ तास युद्धाचा सराव रंगला. यामध्ये अवाढव्य रणगाडे, टेहळणी करणारे लष्कराचे हेलिकॉप्टर, कानठळ्या बसवणारा तोफांचा मारा, गोळीबार तर मध्येच धुरांचे लोट असा हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर चालणारा थरार के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांतून प्रत्यक्षात पाहायला मिळाला.
लष्करी जवानांचा हा दोन तासांचा युद्धाचा थरार पाहून निमंत्रितही थक्क झाले. सुरुवातीलाच भल्यामोठ्या रणगाड्यांमधून सुटलेले आगीचे लोळ दूरवर असलेल्या शत्रूंच्या चौक्या क्षणात भस्मसात करत होत्या. यावेळी अचानक कानठळ्या बसविणाऱ्या तोफगोळ्यांच्या आवाजामुळे उपस्थितांचा थरकाप उडाला. मेजर जनरल नीरज कपूर ब्रिगेडियर व्हीव्ही सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली हा युद्ध सराव पार पडला.


युद्धभूमीवर रंगलेला हा सराव प्रत्यक्ष पाहणाऱ्या प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले. अचानक हल्ला होऊन एकापाठोपाठ एक तोफांचा मारा, आकाशात घिरट्या घालणारी हेलिकॉप्टरं यासारखी दृश्य डोळ्यांनी पाहताना उपस्थितांची चांगलीच कसरत झाली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच काही क्षणात दूरवरचे लक्ष टिपणाऱ्या अजस्त्र तोफा आणि कानठळ्या बसणारा आवाज सर्वदूर गर्जत होता.
आजच्या या लष्करी सराव प्रात्यक्षिकात प्रमुख आकर्षण होते ते रणगाडे. या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच धोक्याच्या परिस्थितीत शत्रूला हूल देऊन योग्य ते लक्ष टिपण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये असल्याचे या प्रात्यक्षिकातून दिसून आले. तसेच या रणगाड्यात रात्रीच्या अंधारात सुद्धा स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. शिवाय अत्याधुनिक बंदुकातुन दूरवर असलेल्या शत्रूंच्या चौक्या उद्धवस्त करण्याची क्षमता या रणगाड्यांमध्ये आहे. हा सराव पार पडल्यानंतर उपस्थितांना जवळून रणगाडे आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहण्याची आणि हाताळण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details