पुणे -कोरोनाच्या महामारीत एसटी बस खेड्यापासून महानगरापर्यंत अखंड सेवा देत आहे. मात्र, ही सेवा देत असताना एसटीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती राजगुरुनगर आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे यांनी दिली. टाळेबंदीनंतर एसटी आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
मंचर घोडेगाव भीमाशंकर चाकण राजगुरुनगर एसटी महामंडळाच्या आगारातून ६० बसमधून प्रवाशांना सेवा दिली जाते. या आगारामध्ये १५० वाहक, १५० चालक व ५५ वर्कशॉप कामगार काम करत आहेत. राजगुरुनगर आगारामधून डोंगरदऱ्यांमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी ८६ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रतिदिन चार हजार किलोमीटर अंतर पार करून लालपरी प्रवाशांना सेवा देत आहे. मात्र पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने आर्थिक उत्पन्नात घट झाली आहे. इंधनापुरतेही उत्पन्न मिळत नसल्याने एसटीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
राजगुरुनगर आगारातून एसटीच्या पुरेशा प्रवाशाविना ८६ फेऱ्या; इंधनाचाही खर्च निघेना - revenue issue for Maharashtra state transport
कोरोनाच्या संकटात सेवा देणारी एसटी बससेवा आणखी आर्थिक संकटात सापडत आहे. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राजगुरु भागात दिसत आहे.
![राजगुरुनगर आगारातून एसटीच्या पुरेशा प्रवाशाविना ८६ फेऱ्या; इंधनाचाही खर्च निघेना राजगुरू आगाराचे व्यवस्थापक रमेश हांडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8797331-785-8797331-1600082241080.jpg)
इंधनापुरतेही एसटीला उत्पन्न मिळणे कठीण -
राजगुरुनगर आगारामार्फत भीमाशंकर, मंचर, घोडेगाव, चाकण. राजगुरुनगर अशी एसटीची सेवा दिली जाते. या परिसरातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांना प्रवासासाठी एसटी हे एकमेव साधन आहे. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिक कामाव्यतिरिक्त बाहेर पडत नसल्याने एसटीला पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे दिवसभरात चार हजार किलोमीटर अंतर पार करूनही इंधनापुरते ही उत्पन्न एसटीला मिळत नसल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती व्यवस्थापक रमेश हांडे यांनी दिली.
टाळेबंदीचा एसटीला फटका -
लग्नसराईसह सणांनिमित्त अनेक नागरिक एसटीचा प्रवास करत असतात. यातून एसटीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, यंदा राज्यात कोरोना महामारीने थैमान घातल्याने एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली होती. दिवसेंदिवस कोरोनाची महामारी वाढत असतानाही टाळेबंदीत शिथिलता आणण्यात आली. त्यानंतर एसटीची सेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एसटीच्या फेऱ्या रिकाम्याच आहेत. त्यामुळे एसटीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.