बारामती (पुणे) - आयकर विभागाकडून गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार यांचे नातलग आणि निकटवर्तीयांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू करण्यात आली. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी अशी छापेमारी केली जात असेल तर ही चुकीची बाब आहे. आपल्या कुटुंबीयांना त्रास होत असेल तर ही गोष्ट कोणालाही आवडनार नाही. आयकर विभाग कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय होतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. बारामती येथे रविवारी (दि. १०) एका कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलत होते.
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही-
ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आयकर विभागाची छापेमारी कोणावरही होत असते, मात्र कुटुंबियांना त्रास दिला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ही छापेमारी उगीचच त्रास देण्याच्या हेतूने नसावी. सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. केंद्राकडून अपेक्षीत निधी मिळत नसताना महाविकास आघाडी सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतकºयांना मदत करू, असा शब्द दिला आहे. राज्यसरकारमधील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी असा शब्द देते तेंव्हा कोणताही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही, असा विश्वास मला वाटतो.