पुणे- भाजपवाले म्हणतात मते मागायला जायचीसुद्धा आम्हाला आवश्यकता नाही. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रभर कशासाठी फिरत आहे. असा प्रश्न विचारत ज्यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखतही नव्हते ते आज आम्हाला विचारतात की पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे म्हणत शरद पवार यांनी मोदी शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
बारामती येथील मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवार याची प्रचार सभा होती. त्यात बोलताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची जनता ही काही साधीसुधी जनता नाही. या जनतेने विधानसभा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषदेवर ५२ वर्ष मला निवडून दिले आहे. काहीतरी काम केले आहे म्हणूनच जनतेने मला ५२ वर्ष निवडून दिले आहे. तुम्हाला पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत नव्हते आणि तुम्ही मला विचारता आहे की पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असे म्हणत अमित शहा यांचा पवारांनी खरपूस समाचार घेतला.
पुढे बोलताना पवार म्हणाले की सरकार समाजातील लहान घटक, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी वेगळी आणि मोठ्या लोकांसाठी वेगळी भूमिक घेत आहे. आपल्या हिताची जपणूक करणारे सरकार नाही. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही. राज्यभर तरुणांचा मोठा प्रतिसाद असून ही निवडणूक तरुणांनी हाती घेतली असल्याचे सांगून उद्याच्या निवडणुकीत मतदान करताना सतत गैरवापर करणाऱ्यांना धडा शिकवा, असे पवार म्हणाले.