पुणे - एखादा कोरोना संशयित असला तर त्याच्यापासून चार हात दूर राहणेच बरे, अशीच आजकाल सगळ्यांची मानसिकता आहे.आपल्याच नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी लोक धजावत नाहीत. तर बेवारस दूरच. पण समाजात आज अशीही काही माणसे आहेत, ज्यांच्यात माणुसकी अजूनही जिवंत आहे. याचे उदाहरण म्हणजे मंचर येथील माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि त्यांचे युवा सहकारी कल्पेश (आप्पा) बाणखेले. महेश घोडके, आकाश मोरडे,अक्षय चिखले, सुरज धरम, शुभम गवळी, जयेश भालेराव, स्वप्निल लोखंडे, राहुल थोरात, सचिन मोरडे, गोटू शेटे, रुपेश (बंटी) मोरडे, सागर रेणुकादास, खुशाल गाडे व यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रुग्णवाहिका चालक गौरव बारणे, गणेश शिंदे हे होय.
माजी सरपंच व सहकाऱ्यांनी १०९ कोरोनाबाधित मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार मृतदेहाची हेळसांड न करता धार्मिक विधीने अंत्यसंस्कार -
गेल्या वर्षभरात या सर्वांनी मृतदेहाची कुठलीही हेळसांड न करता सर्वांचे धार्मिक विधी पूर्ण करून आजअखेर १०९ रुग्णांचे अंत्यविधी केले आहेत. या सर्वांना अंत्यविधीसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे साहित्य मंचर येथील प्रसन्न भागवत, अमोल पारेख, संजय गांधी (आळेफाटा) हे मेडिकल व्यावसायिक पुरवितात. दत्ता गांजाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कृतीतून आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास वाढतो. त्यांच्या संवेदनशीलतेला समाजाने सलाम केलाय!
जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार -
या वर्षभराच्या काळात या तरुणांनी अनेक वेळा जीव धोक्यात घातला, पण यातील फक्त एकालाच कोरोना झाला. त्यालाही फार काही त्रास झाला नाही. हे फक्तं आणि फक्त त्या कुटुंबियांचे आशीर्वाद व आपले सर्वांचे प्रेम यामुळे असे सांगून दत्ता गांजाळे म्हणाले, आम्ही मृत कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करतोय. तुम्ही कमीत कमी रुग्णांना मदतीचा आणि आत्मविश्वासाचा हात द्या.