खेड (पुणे) -पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील जवळपास 80 पेक्षा अधिक गावांतून आणि चार राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या सुमारे 105 किलोमीटर लांबीच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पूर्व भागातील रिंगरोडला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली. त्यानंतर रिंगरोडसाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी खेड तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाच्या भूसंपादनास मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
614 गटांमधून रिंग रोड जाणार
खेड तालुक्यातील गोलेगाव, धानोरे, मरकळ, सोळू, चऱ्होली खुर्द, आळंदी, केळगाव, चिंबळी, मोई, निघोजे आणि खालूबरे या गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे. तब्बल 614 गटांमधून हा रिंग रोड जाणार आहे. सुमारे या प्रकल्पासाठी खेड तालुक्यातील 260.4108 हेक्टर क्षेत्र अधिग्रहित केले जाणार असून या संदर्भात खेड तालुक्यातील शेतकऱ्याच्या प्राथमिक मिटिंग एम एस आर डी सी विभागाकडून घेतल्या जात आहेत.
शेतकऱ्यांचा रोष
एकीकडे रिंग रोड तर दुसरीकडे पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे असे दोन्ही प्रकल्प खेड तालुक्यातून जात असल्याने अनेक शेतकरी या मध्ये भूमिहीन होणार आहेत त्या मुळे खेड तालुक्यातील गोलेगाव, धानोरे, मरकळ, सोळू, चऱ्होली खुर्द आणि आळंदी मधील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने या गावांमध्ये रिंग रोड आणि पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे तर तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पबाधित इतर गावांमधून होणारा विरोध हा काहीश्या प्रमाणात कमी होत आहे त्यामुळे ह्या प्रकल्पाच्या कामास सुरवात होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागत आहे.