पुणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोक्याच्या क्षणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नाताळ ते ‘थर्टी फर्स्ट’च्या सुट्टीत चांगले उत्पन्न मिळवण्याचे नियोजन करणाऱ्या हॉटेलचालकांना याचा फटका बसला आहे.
संचारबंदीमुळे हॉटेल व्यवसायिकांना ६० टक्क्यांपर्यंत बसणार फटका -
ब्रिटनमध्ये वेगाने पसरणारा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका क्षेत्रात कालपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसणार आहे. पुणे शहरातील हॉटेल व्यावसायिकांना काल (मंगळवारी) एका दिवसात ६० टक्क्यापर्यंत फटका बसला आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली हॉटेल व्यावसायिकांची साखळी अलीकडेच कार्यरत झाली. अजूनही त्यांची घडी पूर्णपणे बसलेली नाही. वर्षांअखेरच्या सुट्ट्यांच्या दिवशी चांगला व्यवसाय होईल, या हेतूने हॉटेलचालकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, निर्बंध लागू करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे, अशी माहिती अविष्कार हॉटेल्सचे मालक बाळासाहेब अमराळे यांनी दिली.