महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र व बिहार पोलिसांची तुलना अशक्य - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस सुशांतसिंह प्रकरण

महाराष्ट्र पोलिसांची क्षमता काय आहे? याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस अशी तुलनाच होऊ शकत नाही. मात्र, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करू नये, अशी आमची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 15, 2020, 5:50 PM IST

पुणे - महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी पाच वर्ष पोलिसांसोबत काम केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची क्षमता काय आहे? याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि बिहार पोलीस अशी तुलनाच होऊ शकत नाही. महाराष्ट्राचे पोलीस सर्वोत्तम आहेत, हे पहिल्या दिवसांपासून सांगत असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मात्र, अनेकवेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी राजकीय दडपणाखाली काम करू नये, अशी आमची अपेक्षा आहे. या प्रकरणात जी काही परिस्थिती निर्माण झाली त्यातून हे प्रकरण सीबीआयकडे गेले पाहिजे अशी जनभावना तयार झाली आहे. म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून या प्रकरणात आता न्यायालयच योग्य तो निर्णय घेईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रीय जनकल्याण समिती आणि महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राजकारण करण्यापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आम्हाला अधिक स्वारस्व आहे. महाविकासआघाडीने अगोदर त्यांचे सरकार नीट चालवावे. सरकार अंतर्गतचं इतकी भांडणे आहेत की, सरकारमध्ये काय चालले आहे हे कुणाच्याच लक्षात येत नाही. विशेषतः प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात जे काही सुरू आहे ते अनाकलनीय आहे, असेही फडणवीस म्हणाले.

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी चुकीच्या बदल्या करण्यास साफ नकार दिला. वेळ पडली तर नोकरी सोडून देईल पण चुकीच्या बदल्या करणार नाही, असे त्यांनी सांगितल्याचे काही वृत्तपत्रात छापून आले आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे. वास्तविक पाहता कोविड-19 च्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही केल्या तरी चालले असते. बदल्यांसाठी देखील मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. जे बदल्या करतात त्यांना त्यांचा भत्ता द्यावा लागतो. त्यामुळे कोरोनाच्या काळात हा सर्व खर्च अनाठायी आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पार्थ पवारांचा विषय कौटुंबिक -

पार्थ पवारांचा विषय हा पवार घराण्याचा कौटुंबिक विषय आहे, त्यांनी तो आपसातच सोडवण्याचा प्रयत्न करावा. आम्हाला त्या विषयात पडायचे नाही. त्याच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे फडणवीस म्हणाले.

बिहार निवडणुकीशी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा संबंध नाही -

भाजपातर्फे वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या राज्यात निवडणुकीसाठी सहाय्य करण्यासाठी पाठवले जाते. त्याचप्रमाणे बिहार निवडणुकीमध्ये सहाय्य करण्यासाठी मला सांगण्यात आले आहे. पक्षाचे जे काही निर्देश असतील त्याप्रमाणे मी त्याठिकाणी काम करेल. याप्रकरणाचा सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details