पुणे : यंदाच्या पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणी हे बचत करून ठेवणे गरजेचे आहे. धरण साखळीतील पाणीसाठा पाहता शहरात पाणीकपात सुरू करण्यात येणार नाही असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. पण जर शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला तर काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित होण्याबाबतच्या समस्येच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आठ दिवसात उपाययोजना सादर कराव्यात असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
शासकीय विश्रामगृह येथे बैठक: जिल्ह्यातील प्रकल्पांची कालवे सल्लागार समिती बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस शहरातील आमदार, खासदार तसेच प्रशासकीय अधिकारी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, यंदा हवामान विभागाच अंदाज पाहता पाण्याची थोडी टंचाई येण्याची शक्यता आहे. आज धरण साखळीत जे पाणी आहे ते ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल यादृष्टीनेही नियोजन करण्यात केले जात आहे. याबाबत शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन हे देखील आत्ताच सुरू केले आहे.तर जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे.