महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 11, 2023, 7:59 PM IST

ETV Bharat / state

Nana Patole On Sanjay Raut : संजय राऊतांनी मला माझ्या शक्तीची जाणीव करून दिली; नाना पटोलेंचे राऊतांच्या विधानावर प्रत्युत्तर

नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेतला. आपल्या शक्तीची जाणिव राऊत यांनी करुन दिल्याचे पटोले म्हणाले. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.

Nana Patole
नाना पटोले

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलताना

पुणे : विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले असते तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अजूनही टिकले असते, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मी किती शक्तिवान आहे याची प्रशंसा संजय राऊत यांनी केली आहे. माझ्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. संजय राऊत यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी मला माझ्या ताकतीच अनुभव करून दिला आहे. त्यामुळे या टिप्पणीला सकारात्मक घेतले पाहिजे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.


महाविकास आघाडीच जिंकणार :पटोले पुढे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही या दोन्ही पोटनिवडणूका जिंकणार आहे. गेल्या 9 वर्षात भाजपचे राज्यातील असो की केंद्रातील सरकार असो या सरकारने महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, व्यापाऱ्यांना संपवणे अशी धोरणे राज्यात राबविली आहे. तसेच देशाची संविधानिक पद्धत संपवण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून करण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टींचा राग जनतेच्या मनात आहे. नुकतेच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून जनतेने दाखवून दिले आहे आणि आत्ता ही जनता पाठिंबा देणार असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. तसेच या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते स्टार प्रचारक म्हणून सभा घेणार आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

भाजपवर केली टीका : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार अशी चर्चा आहे. यावर पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान महिन्याभरात दोन वेळा मुंबईच्या प्रचारासाठी मुंबईत येत आहे. आणि आता कसब्याच्या बाबतीत अमित शाह येत आहेत, याचा अर्थ की राज्यात भारतीय जनता पक्षाची परिस्थिती काय आहे, हे यातून स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधींची तुलना करू नये : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यावर नाना पटोले म्हणाले की, चांगली गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी अक्कल राहुल गांधी नाही. आज राहुल गांधी देशातील सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. तसेच संविधानिक व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. तर दुसरीकडे मोदीजी हे संविधानिक पद्धत बदलत आहे, देश विकत आहे. धर्मा धर्मात भांडण लावण्याचे काम करत आहे. राहुल गांधी राहुल गांधी आहे त्यांची तुलना भाजपचे नेत्यांशी करू नये, असा आमचा सल्ला आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरातांबद्दल काय म्हणाले? : बाळासाहेब थोरात यांच्या विषयी नाना पटोले म्हणाले की, बाळासाहेब आमचे स्टार प्रचारक असून ते येणार आहे. आमच्या पक्षात काहीही गडबळ नाही. आमच्या पक्षात कुठेही अंतर्गत गटबाजी नसून ही गटबाजी दूर करण्याचा प्रश्नच येत नाही, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले. तसेच सत्यजित तांबेंविषयी ते म्हणाले की, तांबे कुटुंबीयांचा वाद होता. त्यावर पक्षाने पडू नये, हीच भूमिका होती. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीनी कारवाई केलेली आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

पटोलेंची राज्य सरकारवर टीका : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावर ते म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बरोबर नाही. महिला आमदार तसेच आमदार, पत्रकार वकील यांच्यावर हल्ले होत आहे. हे सर्व सुरक्षित नाही. पण 50 खोके असलेल्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा तसेच माजी आमदारांना वाय प्लस सुरक्षा, नातवाला, बायकोला, सुनेला सुरक्षा देण्यात आलेली आहे. या वाय प्लस सुरेक्षेचा खर्च हा दिवसाला 20 लाख रुपये होत आहे. जनतेच्या पैश्यांची लूट हे सरकार करत आहे. येणाऱ्या अधिवेशनात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधानांवर पटोलेंची टीका : अदानींच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागणार आहे की ते जनतेचे चौकीदार आहे की अदानीचे चौकीदार आहे. तेच तेच भाषण न करता त्यांना याच उत्तर द्यावे लागणार आहे. अदानीला काँग्रेसने मोठ केले आहे अस त्यांचे म्हणणे आहे तर अदानी 8 वर्षापूर्वी कुठे होते आणि आत्ता कुठे आहे. याचे उत्तर त्यांनी द्यावे. देशातील दोन नंबरचा श्रीमंत माणूस अदानी हा या आठ वर्षात झाला आहे. 50 वर्षात अदानी कुठे होते आणि आत्ता कुठे आहे, याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा :Shambhuraj Desai On Sanjay Raut : संजय राऊत आले की लोक चॅनेल बदलतात; उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details