शिरूर (पुणे)- कोविड -१९ बाबत ताबडतोब आराखडा जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार, असा इशारा भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीने लोकप्रतिनिधीना दिला आहे. कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता राज्य सरकार पुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे. अशातच महाराष्ट्रात पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यात शिरुर तालुका हा हॉटस्पॉट ठरत असून लोकप्रतिनिधीचे कष्ट दिसून येत आहे. मात्र क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरुरच्या लोकप्रतिनिधींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कामावर प्रश्नचिन्ह
शिरूर तालुक्यात कोवीड -१९ चा प्रकोप वाढतच चालला असताना अनेक लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. पण प्रशासन एका कुटुंबाची चमकोगिरीत मग्न आहे,तर सत्ताधाऱ्यांकडुन नीच राजकारण केले जाते. प्रशासनाने कोविड - १९ बाबत ताबडतोब आराखडा जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर शिरुर तालुक्यातील शिरुर - हवेली आमदारांचा दीड कोटीचा ड निधी, डि.पी.सी.चा ३०% निधी, आपत्ती व्यवस्थापनाचा तहसीलदार यांच्याकडे आलेला कोविड -१९ निधी गेला कुठे असा सवाल पाचंगे यांनी मांडला आहे.
कोविड १९ चा निधी कुठे गेला
तसेच जो निधी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे आलेला आहे, त्या संपुर्ण निधीतून एकही ऑक्सिजन सुविधेसह व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध असणारे बेड तयार केले नाहीत. शिरूर -आंबेगावमधील शिरुर तालुक्यातील ३७ गावातही कोविड १९ चा निधी कुठे गेला, असा सवाल पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.