पुणे : राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा काय निकाल लागणार आहे याबाबत सगळीकडे उत्सुकता लागली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत विचारले असता ते म्हणाले की उद्या सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निकालाचा सन्मान जनता करेल. आपण संविधान मानणारे आहोत. माझी जबाबदारी ही केवळ या निमित्ताने महत्वाची ठरत नाही. तर मी अध्यक्षपद स्वीकारले तेव्हापासून जबाबदारीने काम करत आलो आहे असे यावेळी नार्वेकर म्हणाले. ते आज भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आले होते.
भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन :भारती विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम भारती विद्यापीठ संकुल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आलं आहे.