बारामती - अरे बाबांनो, पत्रकारांनो आणि राजकिय पक्षांच्या नेत्यांनो आज आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊया. ते कसे सोडवता येतील ते पाहूया. उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना कशा भडकतील, संभ्रामावस्ता कशी निर्माण करता येईल याकडे दुर्लक्ष करावे. प्रसारमाध्यमांनी देखील आता हे कमी करावं आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. ते बारमती दौऱ्यावर असताना बोलत होते.
Ajit Pawar in Baramati : अरे बाबांनो, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्त्व द्या; अजितदादांचे आवाहन - अजित पवार बारामतीत
उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना कशा भडकतील, संभ्रामावस्ता कशी निर्माण करता येईल याकडे दुर्लक्ष करावे. प्रसारमाध्यमांनी देखील आता हे कमी करावं आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.

एकोप्याने रहा - दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणूकीमध्ये रात्री काही अपप्रकार घडले. हे आपल्यासुद्धा पाहण्यात आले असतील. सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपआपले सण आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये. संविधानामुळेच आपला देश एकसंघ आहे. आज आजूबाजूच्या देशांची काय अवस्था आहे. असे असताना सुद्धा आपला एवढा मोठा खंडप्राय देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीमुळे व संविधानामुळे एकसंघ राहिला आहे.
माझ्या नावानं पावत्या फाडू नका - जेम्स लेनने नुकत्याच केलेल्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता ते म्हणाले, मी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. तुम्ही कारण नसताना माझ्या नावाने पावत्या फाडू नका. सध्याच्या विकासाच्या कामांना व राज्यासमोर, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्त्व द्या, असा सल्ला देखील दिला.