महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

४५ सिंधी बांधवांना मिळाले भारतीय नागरिकत्व

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुण्यात आलेल्या ४५ सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व मिळाले.

By

Published : Mar 7, 2019, 11:57 PM IST

भारतीय नागरिकत्व मिळालेले सिंधी बांधव

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या ४५ सिंधी नागरिकांना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून हे लोक भारतात आले होते. या नागरिकांची आज पाकिस्तानच्या नागरिकत्वातून अखेर सुटका झाली. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होता.

यामध्ये कुणी फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्यांची मुले तर कुणी लग्न झाल्यामुळे पाकिस्तानात राहणारे तर आणखी काही कारणास्तव पाकिस्तानात राहणाऱ्या या सिंधी बांधवानी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तो परत कधीच पाकिस्तानात न जाण्यासाठी.

भारतात आल्यानंतर या सिंधी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी १५ ते २० वर्ष वाट पहावी लागली. हे सिंधी बांधव गेली अनेक वर्षे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राहत असले तरी त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पासपोर्ट रिनिव्ह करणे, शिक्षण आणि सरकारी कामातदेखील त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. याशिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना देखील विविध फॉर्म भरून देणे अशा रोजच्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे, याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यांच्या या प्रयत्नाला आज अखेर यश मिळाले असून पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते ४५ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

भारतीय नागरिकत्व मिळालेले सिंधी बांधव

भारतीय नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंद झाला -

मागील २० वर्षापासून भारतात राहणाऱ्या लाज विरवानी म्हणाल्या, एका लग्नकार्यासाठी कुटुंबीयांसोबत २० वर्षांपूर्वी भारतात आले होते. येथील वातावरण पाहून आम्ही तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान मध्ये राहत असताना आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणी जाणवायच्या. घराबाहेर पडतानाही कोणाला तरी सोबत घेऊन जावे लागायचे. आता आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळाल्यामुळे खूप आनंद झाला असून तहान भूक विसरून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

६० अर्जांची छाननी करून ४५ नागरिकांना भारतीयत्व देण्यात आले - जिल्हाधिकारी

याविषयी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातील अल्पसंख्यांक नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना मिळाले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या ६० अर्जांची छाननी करून त्यातील ४५ नागरिकांना भारतीयत्व देण्यात आले. पुणे जिल्ह्यातून अशाप्रकारे निर्वासितांचे १६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. आज ज्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळाले त्यांचे कागदपत्र मागील काही दिवसांपासून आयबीकडे प्रलंबित होते. आयबीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आज अखेर या नागरिकांना भारतीयत्व बहाल करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details