पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या ४५ सिंधी नागरिकांना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रासाला कंटाळून हे लोक भारतात आले होते. या नागरिकांची आज पाकिस्तानच्या नागरिकत्वातून अखेर सुटका झाली. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होता.
यामध्ये कुणी फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्यांची मुले तर कुणी लग्न झाल्यामुळे पाकिस्तानात राहणारे तर आणखी काही कारणास्तव पाकिस्तानात राहणाऱ्या या सिंधी बांधवानी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तो परत कधीच पाकिस्तानात न जाण्यासाठी.
भारतात आल्यानंतर या सिंधी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी १५ ते २० वर्ष वाट पहावी लागली. हे सिंधी बांधव गेली अनेक वर्षे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राहत असले तरी त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व होते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. पासपोर्ट रिनिव्ह करणे, शिक्षण आणि सरकारी कामातदेखील त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. याशिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना देखील विविध फॉर्म भरून देणे अशा रोजच्या अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे, याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यांच्या या प्रयत्नाला आज अखेर यश मिळाले असून पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते ४५ नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.