ईटीव्ही भारत विशेष : कोरोनाकाळात फळविक्रीत 40 टक्क्यांची घट.. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर - फळाचे दर कडाडले
साधारणपणे मार्च महिन्यात कोरोना आला आणि सर्व व्यवसायात मंदी आली. यातून फळविक्रेतेही सुटले नाहीत. कोरोनाआधी जोमात सुरू असणारा फळविक्रीचा व्यवसाय अनलॉक काळात ६० टक्क्यांवर आला असल्याचे विक्रेते सांगतात. मात्र कोरोनानंतर फळांचे दर कडाडले असल्याने सर्वसामान्य फळे खरेदी करू शकत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

पुणे - कोरोनामुळे सर्व व्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून तीच परिस्थिती फळ विक्रेत्यांची आहे. कोरोना काळाच्या आधी जोमात चालणारा फळांचा व्यवसाय सध्या 60 टक्क्यांवर आला असून 40 टक्के ग्राहकांनी फळे खरेदीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमध्ये मार्केट बंद असल्याने फळं मिळत नव्हती. आता या उलट परिस्थिती असून ग्राहक नसल्याचे फळ विक्रेते सांगत आहेत. हीच परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक फळ विक्रेते फळांची होम डिलिव्हरी करत असल्याचे फळ विक्रेते समाधान अनभुले यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे अवघं जग हैराण झाले आहे. यामुळे छोट्या मोठ्या उद्योगांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. याचा थेट फटका छोटा व्यवसाय असलेल्या फळ विक्रेत्यांना बसला आहे. कोरोना आधीची परिस्थिती आणि सद्यस्थितीत यात खूप फरक असल्याचं फळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे. कोरोना आला त्यामुळे लॉकडाऊन लागू करावा लागला, यात व्यवसायाला मोठा फटका बसला असून हाच व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत असं अनभुले यांनी सांगितले आहे.