महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्मभूमी फाऊंडेशनचा दुष्काळात शेतकऱ्यांना आधार; पाथरीच्या बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात

पाथरी तालुक्यात जन्मभूमी फाऊंडेशनच्या माध्यमातून लोकसहभाग घेत ओढे, नाले यांचे खोलीकरण करून त्यावर सिमेंट बांध टाकण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गौण खनिजाच्या उत्खननाची प्रशासकीय परवानगी घेऊन वाघाळा-फुलारवाडी (ता. पाथरी) सिमेवर जायकवाडीचे अतिरीक्त वाहून जाणाऱ्या सांडव्याचे खोलीकरण करून सिमेंट बांध टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होणार असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

By

Published : Jun 6, 2019, 10:37 AM IST

पाथरीच्या बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात

परभणी- पाथरी तालुक्यात जन्मभूमी फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सततच्या दुष्काळापासून सुटका मिळण्यासाठी आधार मिळाला आहे. या फाऊंडेशनच्या वतीने लोकसहभाग घेत ओढे, नाले यांचे खोलीकरण करून त्यावर सिमेंट बांध टाकण्याचे काम सुरू आहे.

पाथरीच्या बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात

या अंतर्गत गौण खनिजाच्या उत्खननाची प्रशासकीय परवानगी घेऊन वाघाळा-फुलारवाडी (ता. पाथरी) सिमेवर जायकवाडीचे अतिरीक्त वाहून जाणाऱ्या सांडव्याचे खोलीकरण करून सिमेंट बांध टाकण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा होणार असून हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील यांनी दिली.

पाथरी व मानवत तालुक्यातील निवासी, अनिवासी अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत ४ वर्षापूर्वी जन्मभूमी फाऊंडेशन न्यासाची स्थापना केली. पाथरी तालुक्यात सातत्याने दुष्काळ पडत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पार कोलमडून गेले आहे. गतवर्षी दिपावलीत जन्मभूमी फाऊंडेशनच्या स्नेहमिलन कार्यक्रमात यापुढे जलसंधारणाची कामे लोकसहभाग घेत करण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार तालुक्यात सर्वात कमी पर्जन्यमान होत असलेल्या वाघाळा येथे जायकवाडीच्या सांडव्याचे शिरपूर पॅटर्नप्रमाणे खोलीकरण करण्यात आले. तसेच त्यावर सिमेंट बांध टाकण्यासाठी जायकवाडी पाटबंधारेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले.

त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून गौणखनिज उत्खननाची रितसर परवानगी घेऊन २२ डिसेंबर २०१८ रोजी उपविभागिय अधिकारी व्ही. एल. कोळी यांच्या हस्ते नाला-सांडवा साफसफाईला सुरूवात केली. हे काम एक पोकलेन आणि जेसीबी यंत्राच्या साहाय्याने १२ दिवसात पुर्ण केला. त्यानंतर ९ मे २०१९ पासून या सांडव्याचे खोलीकरण कामास कोहिनूर कन्स्ट्रक्शन्सकडून सुरुवात केली. एकूण सव्वा पाचशे मिटर लांबपैकी ४० फुट रुंदी आणि १५ ते २० फुटाची खोलीचे काम करत आजपर्यंत सव्वा चारशे मिटर लांबीचा टप्पा या आठवड्यात पूर्ण होणार आहे. या बंधाऱ्याच्या कामासाठी ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मदत करत आहेत. अनेकजण या कामाला भेटी देऊन पाहणी करत आहेत.

याठिकाणी होत असलेल्या बंधाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात कॅनॉलमधून वाहणारे पाणी आणि दरवेळी जायकवाडीतून आलेली पाणी याठिकाणी अडली जाऊन ते पाणी जमिनीत मुरणार आहे. हे ठिकाण दोन्ही गावच्या उंचावर असल्याने पाणी गावच्या दिशेने पाझरणार आहे. पाणी पुरवठ्याची विहिर या ठिकाणापासून ५०० मिटर अंतरावर असल्याने याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनादेखील शेती पिकासाठी फायदा होणार आहे. या बंधाऱ्यात येणारे पाणी थेट फर्शीवरून मधे येणार असल्याने याठिकाणी गाळ साचणार नसल्याचे देखील घुंबरे पाटील यांनी सांगितले.

या कामाची पाहणी केल्यानंतर जवळच्या बाभळगाव ग्रामपंचायतीनेसुद्धा ठराव घेऊन जन्मभूमी फाऊंडेशनने बाभळगावात देखील अशा प्रकारे बंधारा उभारणी करावा. यामुळे या गावची पाणीटंचाई कायम स्वरूपी मार्गी लागेल, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे जन्मभूमीच्या टीमने शनिवारी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांची भेट घेऊन परवानगी मागितली होती. त्यास जिल्हाधिकारी यांनी देखील सकारात्मकता दाखवली. त्यामुळे त्याठिकाणचा बंधारासुद्धा पूर्ण करण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी सदाशिव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details