परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस; बळीराजाला मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा
परभणीत शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढला. पण मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
परभणीत मोठ्या प्रतिक्षेनंतर पाऊस
परभणी - जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेनंतर पावसाचा जोर वाढलेला आहे. पण मौसमाच्या सुरुवातीलाच लांबलेला पाऊस आणि त्यानंतर पावसात पडलेला मोठा खंड या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील नदी नाले आणि प्रकल्पांमधील साठे वाढविण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे दमदार पाऊस पडल्यानंतरच खऱ्याअर्थाने शेतकरी सुखावेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे.
पडलेला पाऊस जमिनीत मुरला पण त्यानंतर वाढलेल्या उष्णतेमुळे जमिनी कोरड्या पडायला लागल्या होत्या. मात्र, काल सायंकाळनंतर पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात पालम व सोनपेठ याठिकाणी 10 ते 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित जिल्ह्यात केवळ 1 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्या परभणीत सर्वदूर पाऊस पडत असून, याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सुरुवातीला पेरणी झालेल्या पिकांना तग धरण्यासाठी याचा फायदा होईल तर, उशीराने पेरणी झालेल्या पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस लाभदायक असणार आहे. पण तरीही नदी-नाले, ओढे भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असून त्याची सर्वानाच प्रतिक्षा आहे.