परभणी - क्रीडा आणि कलेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमधील या गुणांचे सवर्धन झाले पाहिजे. तसेच विद्यार्थी दशेत सर्वांनी कला व क्रीडा प्रकारात सहभाग घेतलाच पाहिजे. यामुळे आपल्यातील उपजत गुणांना वाव मिळतो. व व्यक्तीमधील खेळाडू वृत्तीचा विकास होतो, यामुळे पुढील जीवनात पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयातील क्रीडा व कला क्षेत्रात यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक एन.एस.राठोड, विद्यापीठ अभियंता डॉ.अशोक कडाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तोकडे मनुष्यबळ असतानाही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर कला व सांस्कृतिक क्षेत्रात घवघवीत यश मिळविले आहे. विद्यापीठास लौकिक मिळवून दिला, ही अभिमानाची बाब आहे. आज इतर राज्यातील अनेक विद्यार्थ्यी विद्यापीठात प्रवेश घेत आहेत. त्यांना विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली असते. त्यांच्यासोबत या सांस्कृतिक वारसाचे देवाणघेवाण झाल्यास मराठवाडा व राज्यातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास हातभार लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर शिक्षण संचालक डॉ.प्रदीप इंगोले यांनी यशस्वी खेळाडुंच्या गुणगौरवामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात मयुरी निळख, रोहित वेताळ, हर्षल गाडे, शुभम गोंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 2018-19 या वर्षात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध युवक महोत्सव, क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या संघाचे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.महेश देशमुख यांनी विद्यापीठाच्या कला व सांस्कृतिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.आशा देशमुख व अशोक खिल्लारे यांनी केले, तर आभार प्रा.डी.एफ.राठोड यांनी मानले.
दरम्यान, गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार कृषिनगर विद्यापीठात पार पाडलेल्या अखिल भारतीय आंतर कृषी विद्यापीठीय युवक महोत्सवात विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले. या युवक महोत्सवात एकांकिका व प्रहसन स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. रांगोळी कला प्रकारात सुवर्ण चषक प्राप्त केलेला कृष्णा अनारसे, कोलाजमध्ये रौप्य चषक प्राप्त केलेला ऋषीकेश नवरकर तर वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या खुशी सातोनकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात क्रीडा प्राध्यापक व मार्गदर्शक डॉ.रवी काळे, डॉ.आशा देशमुख, प्रा.डी.एफ.राठोड, डॉ.पी.एच. गौरखेडे, प्रा.भालचंद्र पवार, विजय सावंत, प्रा ए क्यु खाजा, रंगोली पडघन यांचाही सत्कार करण्यात आला.