महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2020, 4:06 PM IST

ETV Bharat / state

परभणीच्या कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावा या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचारी अधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे.

कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे लेखणी बंद
कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे लेखणी बंद

परभणी - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, या मागणीसाठी विद्यापीठाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वय संघाने आजपासून (सोमवार) लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे परभणीच्या कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्‍यांप्रमाणे राज्यातील अन्य तिन्ही विद्यापीठात हे आंदोलन करण्यात येत आहे.

परभणी विद्यापीठाच्या समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ.दिलीप मोरे, डॉ.गजेंद्र लोंढे, डॉ.सचिन मोरे, डॉ.राजेश कदम, डॉ महेश देशमुख, डॉ रणजित चव्हाण, राम खोबे, सुरेश हिवराळे, कृष्णा जावळे, विश्वाभर शिंदे, आत्मराम कुरवारे यांनी अन्य पदाधिकार्‍यांसह एकत्रित येत हे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवाअंतर्गत अश्वासित प्रगती योजनेसह सातवा वेतन आयोग ताततडीने लागू करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार केला आहे.

'अत्यावश्यक सेवा वगळून आंदोलन'

यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थित राहत हजरी पत्रकावर स्वाक्षरी केली. मात्र, कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन अथवा प्रक्षेत्रविषयक कामे न करता लेखणी बंद आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, कुलसचिव रणजीत पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले. त्याद्वारे कृषी विद्यापीठाला सातवा वेतन आयोग लागु करण्यासंदर्भात समन्वय संघाने आत्तापर्यंत विद्यापीठाच्या स्तरावर व शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने यापूर्वी दिलेली आहेत, असे निदर्शनास आणून दिले.

'राज्यातील अन्य विद्यापीठातही आंदोलन'

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्‍यां समवेत झूम अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन बैठक आयोजित बैठकीत आंदोलनाबाबत चर्चा झाली. त्यानुसार आजपासून हे लेखणी बंद आंदोलनास सुरवात करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी सोमवारी सकाळीच प्रशासकीय इमारतीसमोर एकत्रित येतच आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू केला. 2 ते 5 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन करणार असल्याचे यावेळी विद्यापीठ समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांनी सांगितले.

'....तर बेमुदत लेखणी बंद आंदोलन'
या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी सर्व अधिकारी-कर्मचारी एक दिवस सामूहिक रजा देवून आंदोलन करतील. तर त्यानंतर 7 नोव्हेंबर पासून रोजी बेमुदत लेखणीबंद आंदोलन करणार आहेत, इशारा संघाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details