परभणी- लग्नापूर्वी असलेल्या संबंधावरून प्रियकराने विवाहितेला शेवटचे भेटण्यासाठी बोलावले आणि कोयत्याने गळा चिरून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर उपलब्ध पुराव्याच्या आधारे 24 तासात आरोपीला जेरबंद केले आहे.
मानवत तालुक्यातील रामपूरी शिवारात ऊस तोड करणारी टोळी मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. या टोळीतील एक विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शौचाच्या निमित्ताने टोळीवरून गेली, ती परत आलीच नाही. आई, वडील, सासु, सासऱ्यांनी परिसरात शोध घेतला. पण, ती न सापडल्याने नातेवाईकांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दि. 8 फेब्रुवारीला रामपूरी शिवारातील यादव यांच्या ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आले. प्रेताचे धड अर्धवट अवस्थेत होते. मात्र, साडी, चप्पल यावरुन ही महिला ऊसतोड कामगाराच्या टोळीतील काही दिवसांपूर्वी हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घटनास्थळावर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक आणि डॉक्टरांना पाचारण करुन घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, शेतमालक यादव यांच्या तक्रारीवरून महिलेचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत पोलीसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात झाले. मृत महिलेच्या नातेवाईकांकडून महिलेच्या फोन संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. गावातील ऑटोचालकांकडे तपास केला. या दोन्ही बाबींमधून काही माहिती पथकाच्या हाती लागली. त्या आधारे तत्काळ तट्टू जवळा आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच पुणे येथे पथक रवाना झाले. त्यानुसार पुण्यातून एका संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे मृत महिलेशी असलेल्या संबंधाबाबत पुष्टी दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपीने खून केल्याची कबुली दिली.