परभणी - महाराष्ट्र शासनाने विविध संस्थांच्या शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची थेट भरती न करता त्यांच्यासाठी वेतनोत्तर अनुदानात तरतूद केली आहे. मात्र, शासनाचा हा निर्णय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार असल्याचा आरोप परभणी जिल्ह्यातील संस्थाचालकांनी केला असून त्या विरोधात आंदोलन छेडले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील संस्थाचालकांनी आज (सोमवारी) शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकवला. तत्पूर्वी, जोरदार निषेध करत शासनाच्या अध्यादेशाची होळी करून निदर्शने देखील केली.
परभणीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुपारी 1 वाजता संस्थाचालकांचे हे आंदोलन पार पडले. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, सूर्यकांत हाके, बाळासाहेब राखे, उदय देशमुख, बळवंत खळीकर, संतोष धारासुरकर यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या संस्थाचालक, शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शासनाने यासंदर्भात 11 डिसेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाची होळी करत संस्थाचालकांनी जोरदार निदर्शने देखील केली.
अध्यादेशाची होळी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन -
संस्थाचालकांनी शासनातर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त केला. तत्पूर्वी, संस्थाचालकांचा मोर्चा स्टेशनरोडवरील शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडकला. मात्र, या ठिकाणी कार्यालयात शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने संस्थाचालकांनी त्यांच्या खुर्चीवर निवेदन ठेवत संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार विजय गव्हाणे यांनी परराज्यातून आलेल्या आयएस अधिकाऱ्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप केला. तर संस्थाचालक तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ विवेक नावंदर यांनी शासनाचा हा अध्यादेश गरीब शिपाई प्रवर्गातील कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असून तो रद्द व्हावा, यासाठी यापुढेही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा माध्यमांशी बोलताना दिला.