महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 12, 2020, 7:46 PM IST

ETV Bharat / state

परभणीच्या 'येलदरी' धरणातून जलविद्युतनिर्मितीस प्रारंभ

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या माध्यमातून येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

येलदरी धरण
येलदरी धरण

परभणी - जिल्ह्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून आज (बुधवारी) 3 दरवाजे उघडून जलविद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी पाणी सोडण्यात आले. ज्यातून तीन संचाच्या माध्यमातून 22 मेगाव्हॅट वीज निर्मितीस सुरूवात झाली आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या धरणाचे आज सकाळी 11 दरवाजे 30 सेमी उघडण्यात आले असून त्यातून 13 हजार क्युसेक वेगाने पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे पूर्णा नदीच्या माध्यमातून येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे.

बुधवारी सकाळी 6 वाजता जलाशयात 96.56 टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला होता. पाण्याची प्रचंड आवक होत असल्याने प्रशासनाने बुधवारी धरणाचे 3 दरवाजे उघडले. त्यातून जलविद्युत प्रकल्पास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्यामुळे वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. यातून 22 मेगाव्हॅट विजेची निर्मिती होणार आहे.

येलदरी धरणाची बुधवारी पाणीपातळी 461.500 मीटर इतकी असून, तर पाणीसाठा 906.609 दलघमी म्हणजेच 31.1 टीएमसी तर जीवंत पाणीसाठा 781.932 दलघमी इतका आहे. ज्याची टक्केवारी 96.56 टक्के इतकी होते. मागील 24 तासात या धरणात 34.345 दलघमी इतका पाणी साठा उपलब्ध झाल्याची माहिती पूर्णा पाठबंधारे विभागाच्या प्रशासनाकडून मिळाली आहे.

दरम्यान, जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण हे तब्बल 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले आहे. मातीत बांधण्यात आलेले हे धरण आजही भक्कम स्थितीत उभे आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्प असून त्यातून वीजनिर्मितीसाठी बुधवारपासून पाणी सोडण्यात आले आहे. येथे तीन संचाद्वारे वीजनिर्मिती करण्यात येते. ज्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. दरम्यान, येलदरी धरणामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभ क्षेत्रास निश्‍चितच फायदा होणार आहे. सिंचनासह पाण्याचा प्रश्‍नही मिटण्यास मोठी मदत होणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाने पूर्णा नदी काठावरील नागरिकांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details