परभणी -आज घडीला देशात अडीचशे दशलक्ष टन पेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादनाचा विक्रम आहे. फळ व भाजीपाल पिकांतही विक्रमी उत्पादन होत आहे. आपण जगात दुध उत्पादनात अग्रेसर आहोत. हे सर्व कृषि क्षेत्रातील विकास होतांना शेतकऱ्यांचे उत्पन्न मात्र त्या प्रमाणात वाढलेले नाही. आज शेतीत अधिक उत्पादन देणाऱ्या हरितक्रांतीपेक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणाऱ्या क्रांतीची गरज आहे, तरच शेती, शेतकरी व देश टिकेल. देशाच्या कृषि विकासाच्या केंद्रस्थानी शेतकरी कल्याण हेच ध्येय असले पाहिजे, अशी भावना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, या अभ्यास समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -परभणीत सत्ताधारी खासदारांचे महावितरणविरुद्ध आंदोलन; शेतकऱ्यांच्या रोहित्रांसाठी सेना आक्रमक
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि अर्थशास्त्र विभाग व महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ.अशोक ढवण हे उपस्थित होते. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची उपस्थिती होती. डॉ अशोक दलवाई पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न क्रांतीच्या दिशेने कार्य करतांना नागरिकांना पौष्टिक अन्न सुरक्षाही साधता आले पाहिजे. पर्यावरण सुरक्षेकडेही लक्ष द्यावे लागेल. हरित क्रांती मुख्यत: वनस्पती शास्त्रज्ञ, पिक पैदासकर, कृषिविद्या शास्त्रज्ञ, मृदाशास्त्रज्ञ यांच्या आधारे आपण साध्य केली. मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पन्न क्रांतीत शेतमाल व अन्न प्रक्रिया, कृषि निविष्ठा व्यवस्थापन, कृषि उद्योग व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, शेतामाल विपणन व निर्यात आदी क्षेत्रातील तज्ञ व शास्त्रज्ञांची भुमिका महत्वाची राहणार आहे. शेतमालाची नासाडी ही मोठी समस्या आपल्या समोर आहे. त्यामुळे शेतमाल काढणी पश्चात तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जीवाश्म इंधनाच्या माध्यमातुन देशात औद्योगिक क्रांती झाली, परंतु हे जीवाश्म इंधन पुर्ननिर्माण करता येत नाही, याचे साठे कमी झाले. आता पुढील औद्योगिक क्रांतीसाठी आपणास अक्षय उर्जा स्त्रोत म्हणजेचे जैव इंधन व शेतीतील बायोमासचा उपयोगच करावा लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्हणाले की, मराठवाडा व विदर्भ विभागातील कोरडवाहु क्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोठे आव्हान आहे. संशोधनाच्या आधारे कृषि तंत्रज्ञान विकसित करणे ही कृषि विद्यापीठाची प्रमुख भुमिका असुन कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञानात्मक पाठबळ व शासनाचे धोरणात्मक पाठबळ या जोरावर आपण हे आव्हान पेलु शकु. अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा व उपजीवीका सुरक्षेसाठी माती, पाणी, कृषि निविष्ठ आदींची प्रति एकक कार्यक्षम वापर करून शेतमाल उत्पादन वाढ आपले ध्येय असले पाहिजे.