महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणी जिल्ह्यातील तब्बल 127 गावांमध्ये दुषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला तपासण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये 127 गावांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित आहे, हे यावरून स्पष्ट होते.

By

Published : Nov 12, 2019, 7:17 AM IST

परभणी जिल्ह्यातील तब्बल 127 गावांमध्ये दुषित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

परभणी -जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याला तपासण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये 127 गावांमधील पाणी दूषित आढळून आले आहे. ज्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.


परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सार्वजनिक पाणी पुरवठा स्त्रोत्रांची तपासणी आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यात देखील पाण्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 131 प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांमध्ये घेतलेल्या 538 नमुन्यांच्या तपासणीमध्ये 95 नमुने दूषित आढळले आहेत. तर लघु प्रयोगशाळेत 332 नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये 40 नमुने दूषित आढळले. एकूण 915 नमुन्यांपैकी 135 पाण्याचे नमुने दूषित आहेत.एकूण 15 टक्के पाणी दूषित असल्याचे यातून पुढे आले आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे. नागरिकांचे आरोग्य किती सुरक्षित आहे, हे यावरून स्पष्ट होते.


दरम्यान, परभणी तालुक्यातील बारा गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आहेत, तर पूर्णा तालुक्यात 9, गंगाखेड सोनपेठमध्ये 6, पालम 2, सेलू 26, मानवत 7, जिंतूर तालुक्यात 31 तर पाथरी तालुक्यातील 3 गावांमध्ये सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील माळसोन्ना, धसाडी, अमडापूर, तरोडा, करडगाव, नांदखेडा, टाकळी कुंभकर्ण, या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह 127 गावांचा समावेश आहेत.


दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे नमुने दूषित आढळल्याने जिल्हा तथा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. पाण्याचे शुद्धीकरण, टाक्या स्वच्छ करणे तसेच नागरिकांना देखील स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्याचे काम तात्काळ सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details