परभणी- एका वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी परभणीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे यांनी ही तक्रार केली असून गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पालघर जिल्ह्यात दोन साधू आणि त्यांचे चालक अशा तीघांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातील 110 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले. या विषयावर चर्चा करत असताना अर्णब गोस्वामी यांनी सोनिया गांधी यांच्याविरूद्ध अवमानकारक भाषा वापरली. तसेच जनभावना भडकतील, अशी वक्तव्ये करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप गोविंद यादव यांनी केला आहे. तसेच गोस्वामी यांच्याविरोधात विवध कलमांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. गंगाखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे यांच्या या तक्रार अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. या संदर्भात कायदेशीर बाबींची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती गंगाखेडचे पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांनी दिल्याची माहितीदेखील गोविंद यादव यांनी दिली.