महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे.

By

Published : Jun 20, 2019, 5:26 PM IST

परभणीत अभियांत्रिका प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

परभणी- गेल्या 3 दिवसांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली आहे. ज्या ऑनलाईन सेंटरवरून ही प्रवेश प्रक्रिया होत आहे. त्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असून गेल्या 3 दिवसात केवळ 13 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यामुळे शहरातील शिवाजी महाविद्यालयात गेल्या 3 दिवसांपासून हजारो विद्यार्थी आणि पालक फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ प्रवेश प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

परभणीत अभियांत्रिका प्रवेश प्रक्रिया 3 दिवसांपासून ठप्प, विद्यार्थी हैराण

यावर्षी शासनाने बारावीनंतरच्या विविध कोर्सेससाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. मात्र, ही प्रक्रिया प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र न ठेवता सामायिक केली आहे. राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष यांच्या माध्यमातून अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुविशारद, वैद्यकशास्त्र तसेच इतर 53 शाखेचे प्रवेश या एकाच पोर्टलवरून करून घेतले जात आहेत. यासाठी प्राथमिक फेरीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. मात्र, प्राथमिक फेरीतच असा गोंधळ उडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या संदर्भात काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून कुठलीच ठोस माहिती दिली जात नसल्याचे सांगितले. तर महाविद्यालयाने केवळ इंटरनेट समस्या असून त्यामुळे वेळ लागत असल्याचे सांगितले. काही विद्यार्थी आणि पालक गेल्या 3 दिवसांपासून परभणीत मुक्कामी आहेत, तर अनेकजण तालुक्याहुन आलेले विद्यार्थी दररोज ये-जा करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया हवी- पाथरीकर

शासनाने पूर्वीप्रमाणेच प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवायला हवी. त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ उडणार नाही, अशी अपेक्षा शिवाजी महाविद्यालयाचे अभियांत्रिकी शाखेचे संचालक आनंद पाथरीकर यांनी व्यक्त केली आहे. तर पालकांनी तत्काळ प्रवेश प्रक्रियाची पद्धत सुरळीत करण्याची मागणी केली आहे. एकूणच हा प्रकार असाच चालू राहिला तर येणाऱ्या काही दिवसात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details