परभणी : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतांमधील पीकं होत्याची नव्हती झाली आहेत. अशीच परिस्थिती परभणी तालुक्यातील पेडगाव येथे देखील झाली आहे. येथे एका तरुण शेतकऱ्याच्या पिकांची हिच अवस्था झाली. त्यामुळे यापुढे कुटुंबाचा गाडा कसा हाकावा? या विवंचनेतून या शेतकऱ्याने फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. माधव रघुनाथराव देशमुख (वय 36 वर्ष, रा. पेडगाव, ता. परभणी) असे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पंधरवड्यात 2 वेळा अतिवृष्टी
माधव रघुनाथराव देशमुख सततच्या नापीकीला वैतागले होते. मात्र, यावर्षी पिक परिस्थिती उत्तम असताना मागील पंधरवड्यात 2 वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिके होत्याची नव्हती झाली. याच नैराश्यातून माधव देशमुख यांनी त्यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (19 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली.
गतवर्षीच भाऊ-भावजयीचे अपघाती निधन
गतवर्षीच माधव देशमुख यांचे मोठे बंधू गोविंद देशमुख व त्यांच्या पत्नीचे अपघाती निधन झाले. त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार माधव यांच्या खांद्यावर आला होता. परंतु शेतातील नापिकी आणि अतिवृष्टीमुळे डोळ्यासमोर पिकांचे झालेले नुकसान त्यांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.