पालघर - जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. पालघर, डहाणूसह इतर भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहात असून जिल्ह्यातील धरणांत मुबलक पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. तर धामणी धरण 96.22 टक्के भरले असून धरणाचे तीन दरवाजे सुमारे दीड फूटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.
धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून सूर्या नदीत सुमारे 10 हजार 604 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही धोक्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.