महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 14, 2020, 11:46 AM IST

ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यातील वातावरणावर याचा परिणाम दिसू लागला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाला पडत आहे.

Rain
पाऊस

पालघर (वसई) - सलग तिसऱ्या दिवशी वसई तालुक्यातील सर्व भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. चार दिवसांपासून वसई-विरारमध्ये ढगाळ वातावरण पसरले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शहरी तसेच ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसत आहेत.

या अवकाळी पावसाचा जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. ऐन थंडीच्या हुडहुडीत वसईकरांना पावसाचा अनुभव मिळत आहे. थंडीत घातल्या जाणाऱ्या स्वेटरऐवजी छत्र्या सोबत घेऊन फिरावे लागत आहे. फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी पावसाळ्यानंतर दुकाने आणि गाड्यांवरील ताडपत्री काढून टाकली होती. मात्र, पावसामुळे पुन्हा लावावे लागले आहेत. तर कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची पावसामुळे त्रेधातिरपिट उडली आहे.

मासळी भिजली -

ढगाळ वातावरणासह हवेत गारवा वाढला आहे. शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फटका आता कोळी बांधवांना बसू लागला आहे. मासे सुकवण्याच्या प्रक्रियेवर पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी टाकलेल्या बोंबील, जवळा सारख्या सुक्या मासळीवर पावसाचे पाणी पडत असल्याने आता मासळी कुजू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details