महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुकटण जलशुद्धीकरण केंद्रातून वसई-विरार पालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

धुकटण जलशुद्धीकरण केंद्रातून वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बहाडोलीजवळ फुटली आहे.

By

Published : Dec 7, 2019, 9:40 PM IST

pipeline damange
पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

पालघर- धुकटण जलशुद्धीकरण केंद्रातून वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बहाडोली गावाजवळ शुक्रवारी संध्याकाळी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे 10 ते 12 फूट उंच पाणी उसळून कारंजा तयार झाला. मात्र, यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. त्याचबरोबर आसपासच्या परिसरात असलेल्या शेतात हे पाणी जाऊन शेताचे देखील नुकसान झाले आहे.

धुकटण जलशुद्धीकरण केंद्रातून वसई-विरार पालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

हेही वाचा -प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

पालघर तालुक्यातील धुकटण जलशुद्धीकरण केंद्रातून वसई -विरार पालिकेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बहाडोली गावाजवळ राहणारे चंद्रकांत घरत यांच्या घरासमोर शुक्रवारी संध्याकाळी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी आसपासच्या शेतामध्ये शिरले. त्यामुळे शेतांचे नुकसान झाले आहे.

काही तासानंतर पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या जलवाहिनीची दुरुस्ती केली. मात्र, दोन वर्षांपूर्वी याच परिसरात राहणारे दत्तात्रय गणपत पाटील यांच्या घराजवळ रात्रीच्या सुमारास हीच जलवाहिनी फुटून त्यांचे पूर्ण घर वाहून गेले होते. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या जलवाहिनीची वसई-विरार महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही. त्यातच सुरक्षारक्षक नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना या सतत घडत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मासवण ग्रामपंचायत हद्दीत सूर्या नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून वसई-विरार पालिकेला येथून पाणीपुरवठा केला जातो. सूर्या नदीवरून चार पंपाद्वारे उचलण्यात येणारे पाणी चार किलोमीटर अंतरावर धुकटण या गावी जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी धुकटण येथील डोंगरावर उंच ठिकाणी एका मोठ्या विहिरीमध्ये नेले जाते. तेथून ते थेट विनापंप पाणी पाईपद्वारे वसई-विरार महानगरपालिकेने बांधलेल्या जलकुंभामध्ये सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा वेग खूप असतो. या पाण्याच्या वेगाने उत्पन्न होणारा हवेचा दाब निघून जाण्यासाठी एअरव्हॉलची सुविधा ठेवण्यात आली आहे.

या जलवाहिनीची सुरक्षा रामभरोसे असून कुठल्याही प्रकारची निगराणी वसई-विरार पालिकेकडून केली जात नाही. त्याचप्रमाणे या जलवाहिनीला असलेली छोटीमोठी गळती कधीही दुरुस्त केली जात नाही. त्यामुळे कधीकधी हवेचा मोठा दाब निर्माण झाल्यावर जलवाहिनी उधळून लाखो लिटर पाणी वाया जातेच आणि त्यापासून जवळ असलेल्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.

ABOUT THE AUTHOR

...view details