महाराष्ट्र

maharashtra

खानिवडे येथील शेतकऱ्याने पिकविले पाच ते सहा फूट उंचीचे भात पीक

By

Published : Oct 11, 2020, 6:06 PM IST

भात पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव आणि पावासामुळे नासाडी होत असताना, वसईमधील एका शेतकऱ्याने या दोन्ही समस्यांवर तोडगा काढत भात पीक तगवले आहे. विशेष म्हणजे, ही किमया त्यांनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून केली आहे.

भात पीक
भात पीक

वसई (पालघर) - वसई विरारमधील बहुतांश ठिकाणच्या भागात भात पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. असे असतानाच वसई पूर्वेतील खानिवडे येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याने नैसर्गिक खताचा वापर करून चक्क पाच ते सहा फूट उंचीचे भात पीक घेतले आहे.

विश्वनाथ कुडू यांची प्रतिक्रिया

वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात दरवर्षी भातशेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात उगवणारे पीक हे साधारण अडीच ते तीन फूट उंचीचे असते. परंतु विश्वनाथ कुडू आणि त्यांच्या परिवाराने एकदम साध्या पद्धतीने भात पिकांची लागवड केली होती. सेंद्रिय खतावरच ही भात शेती फुलविली असून भात पिकाची उंची ही पाच ते सहा फूट इतकी वाढली आहे. याला आलेली कणसे देखील चांगलीच भरली आहेत. याआधी येणाऱ्या कणसांना १२० ते १५० दाणे येत होते. यावर्षीच्या कणसाला साधारणपणे २५० ते ३०० दाणे असल्याचे कुडू यांनी सांगितले आहे. यामुळे उत्पन्न सुद्धा चांगले निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी रासायनिक खते आणि औषधांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतपिकावर खोडकीडा व करपा रोगाचे संकट असल्याने यंदाचे भातपिक करपून गेले आहे. शिवाय परतीच्या पावसानेही पीक आडवे केले होते, असे झाले असतानाही एवढ्या उंचीचे भात पीक आडवे झाले नाही, ही विशेष बाब असल्याचे कृषीविभागाने सांगितले आहे. वसई तालुक्यातील हे पहिलेच यशस्वी भात पीक असून त्याची दखल कृषी विभागकडूनही घेण्यात आली आहे.

हेही वाचा -'तुम्हाला मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचे आहे'; भागवतांच्या विधानानंतर ओवेसींचे टिकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details