पालघर -लॉकडाऊन काळात पालघर-टेंभोडे येथील जयेश आणि रेश्मा मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत 'लॉक' झाले. या नवदाम्पत्याने लग्नसमारंभाला होणारा खर्च टाळून 10 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला आहे.
लॉकडाऊन : पालघरमधील नवदाम्पत्य लग्नाच्या बेडीत 'लॉक,' मुख्यमंत्री निधीत 10 हजारांची मदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लग्न समारंभ रद्द झाले आहेत. अनेक दाम्पत्यांनी लग्नाचा शुभमुहुर्त पुढे ढकलला आहे. पालघर तालुक्यातील टेंभोडे येथील जयेश पमाळे व पारगाव येथील रेश्मा पाटील यांचा विवाहसोहळा 16 एप्रिल 2020 रोजी नियोजित होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले हे लॉकडाऊन काही दिवसांनी संपेल, अशा आशेत असलेल्या या दाम्पत्याने आपला विवाहसोहळा पुढे ढकलला. मात्र हे लॉकडाऊन वाढतच चालल्याचे पाहिल्यानंतर जयेश व रेश्मा यांनी लॉकडाऊन काळातच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे ठरवले. त्यानंतर या दोघांच्या लग्नास परवानगी मिळावी, यासाठी मुलाचे काका भगवान पामाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केला. त्यानंतर नियम व अटी-शर्तींंसह 12 मे रोजी हे लग्नकार्य करण्यास परवानगी मिळाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात मंगळवारी 12 मे रोजी पारगाव येथे जयेश व रेश्मा यांचा विवाह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत व अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. लग्नसोहळा उरकताच या नवदाम्पत्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. लग्न सोहळ्यानिमित्ताने होणारा खर्च टाळून या दाम्पत्याने 10 हजार रुपयांचा धनादेश कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला. उपजिल्हाधिकारी डॉ. महाजन, तहसीलदार उज्वला भगत, सचिव मारुती लोहकरे यांच्या उपस्थितीत नवदांपत्याने हा धनादेश सुपूर्द केला.