पालघर- वैतरणा रेल्वे पुलावरून पायी जाणारी महिला वैतरणा खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेबी रमेश भोईर (वय 58) असे खाडीत पडलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडली. महिलेच्या शोधासाठी बोटीने शोध मोहीम सुरु असून या महिलेचा शोध अद्याप लागलेला नाही.
रेल्वे पुलावरून पायी जाणारी महिला पडली वैतरणा खाडीत; अद्याप शोध सुरु
वैतरणा रेल्वे पुलावरून पायी जाणारी महिला वैतरणा खाडीत पडल्याची घटना घडली आहे. महिलेच्या शोधासाठी बोटीने शोध मोहीम सुरु असून या महिलेचा शोध अद्याप लागला नाही.
वैतरणा स्थानकातून वाढीव गावात जाण्यासाठी वैतरणा रेल्वेचा 92-93 हा पूल ओलांडून राहिवाशांना जावे लागते. दररोज सकाळ-संध्याकाळ शेकडो शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध व इतर प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन हा प्रवास करीत असतात. या रहिवाशांना जाण्या-येण्यासाठीची व्यवस्था करावी किंवा वाढीव गावासाठी रेल्वे स्थानक निर्माण करावे यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून रेल्वे आणि लोकप्रतिनीधींच्या उदासीन धोरणामुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.