पालघर - पतंग पकडण्याच्या नादात नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील एका चार वर्षाच्या बालकाचा उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. वन्स चंडालिया असे या बालकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. वन्सच्या अशा मृत्यूमुळे चंडालिया कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पतंग पकडण्याच्या नादात पाण्याच्या टाकीत पडून ४ वर्षीय बालकाचा मृत्यू
पतंग पकडण्याच्या नादात नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथील चार वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या प्रकरणी तुळींज पलोसी ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आचोळे पटकल पाडा येथे राहणारे विकास चंडालिया यांचा मुलगा वन्स बुधवारी संध्याकाळी संक्राती निमित्ताने पतंग उडविण्यासाठी व खेळण्यासाठी घराच्या परिसरातच बाहेर गेला होता. मात्र, रात्र उलटली तरी तो घरी परतला नाही त्यामुळे वन्सचे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. त्याच्या कुटुंबियांनी मित्रपरिवार परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. जवळच एका इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत बंद होते त्याठिकाणी झाकण नसलेल्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. त्यातील एका टाकीत त्याचा मृतदेह गुरूवारी सकाळी 10 च्या सुमारास स्थानिकांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती तुळींज पोलिसांना मिळताच घटनेचा पंचनामा करून तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघाती मृत्यू बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.