उस्मानाबाद -देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने, पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे गाव सोडून बाहेरगावी गेलेले लोक आता आपापल्या गावी जाताना दिसत आहे. हाताला काम नसल्याने त्यांना गाव गाठणे महत्वाचे वाटत आहे. यातच जालना जिल्ह्यातील शेवली गावातील जवळपास 20 मजुरांना गावी जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबमध्ये पकडण्यात आले.
कोरोना लॉकडाऊन : जालन्यातील 20 ऊसतोड कामगार मुलाबाळांसह उस्मानाबादेत 'कुलूप बंद' - स्थलांतरित ऊसतोड कामगार
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. या निर्णयामुळे अनेक लोक स्वतःच्या गावाकडे स्थलांतर करत आहेत.

हेही वाचा...लॉकडाऊन : जीवनावश्यक वस्तुंसाठी ६०.९ टक्के भारतीयांना मोजावे लागताहेत जादा पैसे
कळंब येथे पकडण्यात आलेले सर्व मजूर कोल्हापूरमधील शाहू कारखाना येथे ऊसतोड करण्यासाठी आले होते. यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा कारखाना बंद झाला आहे. त्यामुळे हे सर्व मजूर आपापल्या गावी निघाले होते. मात्र, लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना कळंब येथे ताब्यात घेतले. या सर्व मजूरांची उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर या सर्वांनाच कळंबमधील जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत 'कुलूप बंद' करून ठेवण्यात आले आहे.