महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2020, 7:54 AM IST

Updated : Oct 24, 2020, 1:25 PM IST

ETV Bharat / state

आत्माशांतीसाठी चिमुकल्याचा नरबळी... आत्या, आजोबासह सहाजणांना जन्मठेप

उस्मानाबादमधील कंळब तालुक्यात २०१७ मध्ये एका चिमुकल्याचा नरबळी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता. या हत्याकांडात चिमुकल्याच्या नातेवाईंकांनीच अंधश्रद्धेतून त्याचा नरबळी दिला असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ife imprisonment for murder
आत्माशांतीसाठी चिमुकल्याचा नरबळी.

उस्मानाबाद- कळंब तालुक्यातील पिंपळगावामध्ये 2017 मध्ये नरबळीचे प्रकरण समोर आले होते. यात सहा वर्षाच्या कृष्णा इंगोले या लहान मुलाचा नरबळी देण्यात आला होता. याप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबादचे सत्र न्यायाधीश एम.जी. देशपांडे यानी ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी चिमुकल्याच्या जवळच्याच नातेवाईकांनी बळी दिला होता. यात त्याची सख्खी आत्या, चुलत आत्या, चुलती, आजोबा यांनी पुणे येथील मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सुर्यवंशी यानी न्यायालयासमोर बाजू मांडली.

चिमुकल्याचा नरबळी

पिंपळगावात राहणारा कृष्णा इंगोला हा सहा वर्षाचा चिमुकला 26 जानेवारी 2017 शाळेतून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून वस्तीवरील घरी परत आला होता. घरी आई नसल्याने तो बाहेर खेळत होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी मुलाला पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता. याचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यानी केला.

असा केला कृष्णाचा खून

कृष्णाच्या मृतदेहाजवळ सापडेल्या साहित्यावरून हे प्रकरण नरबळीचे असल्याचा अंदाज बांधला जात होता. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. तपासात कृष्णाची आत्या द्रोपदी पौळ हिने अंगणात खेळत कृष्णाला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर तिने कृष्णाला त्याचा चुलता आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील सामाईक विहिरीवरजवळच्या दाट झाडीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले.

मांत्रिकाचा सल्ला ऐकला

आरोपी उत्तम इंगोले यांची मृत चुलत बहिण कडुबाई तसेच आरोपी साहेबराव इंगोले यांची मृत पत्नी यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याचा आत्मा भटकू नये, असे म्हणून हा नरबळी दिल्याची माहिती तपासात समोर आली. घरात शांतता नसल्यामुळे आरोपींनी हे संतापजनक कृत्य केले. कृष्णाची आत्या द्रोपदी हिच्या मुलीच्या दोन पतींचा मृत्यू झाला होता. तर एका मुलीची जन्मलेली मुले जिवंतच राहत नव्हती. त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धेचा आधार घेतला. त्यात मृत कडुबाई आणि साहेबरावची पत्नी यांचा आत्मा भटकत असल्याचे पुण्यातील मात्रिक राहुल उर्फ लखण चुडावकर आणि सुवर्णा भाडके या मांत्रिकानी त्यांना सांगितले. घरात शांतता राहण्यासाठी रक्ताच्या नात्यातील नरबळी द्यावा लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानंतर कृष्णाची आत्या आणि इतर आरोपींनी कृष्णाचा नरबळी दिला.

परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे

याप्रकरणी गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्यूपुर्वी व मृत्यूनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनांची साखळी परिस्थितीजन्य पुरावाच्या आधार घेत तपास करण्यास पोलिसांना यश आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Last Updated : Oct 24, 2020, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details