तुळजापूर ( उस्मानाबाद ) -आमदारांना घर देण्यासंदर्भातला कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ( Ashok Chavan on MLA houses scheme ) तुळजापुरात दिली आहे. अशोक चव्हाण तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे ( Ashok chavan Tuljapur Temple visit ) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अशी माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती घोषणा
अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि उपनगरमधील आमदार सोडून 300 आमदारांना घरे देण्यासंदर्भात घोषणा केली होती. मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून येणाऱ्या आमदारांना मुंबई वास्तव्याला घरे असावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान यानिर्णयानंतर राज्यभर राज्य सरकारवर टीका होऊ लागली. सामान्य माणूस उघड्यावर आणि आमदारांना मात्र मोफत घरे, यावरून टीकेची राळ उठली होती.