महाराष्ट्र

maharashtra

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तापले; बसचालकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

By

Published : Nov 3, 2021, 1:03 PM IST

महागाई भत्ता, वेतनवाढ, राज्य शासनात विलगिकरण अशा विविध मुद्द्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. सध्या हे आंदोलन चांगलेच तापताना दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तापले
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तापले

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब आगार येथे विविध मागण्यासाठी एसटी कर्मचारी फास गळ्याला लावून झाडावर चढल्याची घटना ताजी असताना आता उस्मानाबाद आगाराच्या कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. इतर कर्मचाऱ्यांनी ऐनवेळी आत्मदहन करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळले. मागील तीन दिवसात आपल्या मागण्यांसाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही दुसरी वेळ आहे.

महागाई भत्ता, वेतनवाढ, राज्य शासनात विलगिकरण करण्याची मागणी

महागाई भत्ता, वेतनवाढ, राज्य शासनात विलगिकरण अशा विविध मुद्द्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. सध्या हे आंदोलन चांगलेच तापताना दिसत आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी कळंब आगारातील वाहक सच्छिदानंद पुरी हा कर्मचारी गळ्याला फास बांधून झाडावर चढला होता. मागण्या पूर्ण केल्याशिवाय आपण खाली उतरणार नाही असा पवित्रा त्याने घेतला होता. नातेवाईक, प्रशासन आणि स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नामुळे संतप्त कर्मचाऱ्याची मानधारणी करण्यात यश आले होते. ही घटना ताजी असतानाचं उस्मानाबाद आगारातील चालक महादेव नरवडे यांनी मंगळवारी सायंकाळी आगारातील पेट्रोल पंपाजवळ अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा जवळ उभे असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडून ओढत नेले आणि पुढील अनर्थ टळला.

सरकार दखल घेत नाही, डोक्यावर कर्ज, आम्ही जगायचं कसं?

यादरम्यान नरवडे यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सर्वांसमोर ठेवल्या. दिवसरात्र मेहनत करून सरकार आमची दखल घेत नाही, डोक्यावर कर्ज झाले आहे, मग सांगा आम्ही जगायचं कसं? असा संतप्त सवाल नरवडे यांनी या दरम्यान केला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी समजूत काढून त्यांना शांत केले. या दरम्यान आगारात मोठी गर्दी झाली होती. या दोन घटनेमुळे आंदोलनाला अधिकच धार चढत आहे, असेच दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details