नाशिक - केंद्रात चोर-डाकूचे सरकार असून नोटाबंदी करून त्यांनी सर्वाधिक काळ्या पैशांवर डल्ला मारला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि पंतप्रधानांवर केला आहे. ते आज मनमाडमध्ये बापू गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
केंद्रात चोरांचे सरकार, प्रकाश आंबेडकरांची भाजपवर घणाघाती टीका - नोटबंदी
केंद्रात चोर-डाकूचे सरकार आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर केली.
![केंद्रात चोरांचे सरकार, प्रकाश आंबेडकरांची भाजपवर घणाघाती टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3104782-thumbnail-3x2-vbi.jpg)
भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान गुजरातचे आहेत त्यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला दिले. महाराष्ट्राचा माणूस उपाशी मेला तरी चालेल पण पंतप्रधानांची मर्जी राखली पाहिजे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना लगावला.
नोटांवर गव्हर्नरची सही असते. तो नोटांचा मालक असतो आणि नोटा बंदीचा निर्णय पंतप्रधान घेतो. जो माणूस नोटांचा मालक नाही, तो त्या बंद करण्याचा निर्णय कसा घेऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत त्यांनी नोटबंदीचा निर्णय फसला असल्याचे म्हटले आहे.