नाशिक: नोकरीसाठी 7 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर या जॉब फेअरमध्ये कंपन्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यासाठी संदीप विद्यापीठाच्या माध्यमातून नाशिकला जॉबफेअर अर्थात रोजगार महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या जॉब फेअरसाठी महाराष्ट्रातून सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी:या जॉब फेअरमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन,औषध निर्माण, तसेच पदवी, पदविका, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी - पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या आवारात अनेक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना सेंटर्स उपलब्ध करून देण्यात आले. याच दरम्यान अर्हताप्राप्त उमेदवारांचा लागलीच मुलाखती घेऊन त्यांना नोकरीची संधी देण्यात आली. यावेळी इंजिनिअरिंग, मेकनिकल, कॉम्प्युटर, एमबीए, एमसीए, बीसीए, एअर होस्टेस, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इत्यादी कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेले विद्यार्थी सहभागी झाले होते.
थेट नियुक्तीपत्र: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. मात्र आता कुठेतरी पुन्हा एकदा सर्व सुरळीत होत असून कंपन्यांमार्फत युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिली जात आहे. जॉब फेअर हे सर्वच शहरात व्हायला हवे, ज्यातून कंपन्यांना देखील स्किलफुल विद्यार्थी मिळतील आणि विद्यार्थ्यांना देखील नोकरीची संधी मिळेल असे पारस एअर स्पेसच्या एचआर सुजाता गोराय यांनी सांगितले.