नाशिक -लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. डॉ. कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS - Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
२२ वर्षांचा अनुभव -
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांचा जन्म १५ ऑक्टो १९६०रोजी झाला. पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. यानंतर बालरोगशास्त्र या विषयात एमडी प्राप्त केली आहे. २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. सध्या त्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS-Medical) म्हणून दिल्ली येथे कार्यरत आहेत.
हेही वाचा -'मुलींसाठी लष्कर सुरक्षित क्षेत्र, मराठी मुलींनी लष्करात यावे'
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या. कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ. रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे समितीचे सदस्य होते.
पहिल्या मराठी लष्करी महिला अधिकारी -
भारतीय लष्करात मानाचे पदी विराजमान होण्याचा मान डॉ. माधुरी कानिटकर या मराठी लष्करी महिला अधिकाऱ्याला मिळाला आहे. लेफ्टनंट जनरल या पदावर विराजमान होणाऱ्या त्या देशातील तिसऱ्या तर महाराष्ट्रातील पहिल्याच महिला अधिकारी आहेत. लष्कराच्या या मानाच्या पदावर मराठी झेंडा फडकवणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर यांचा सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या मराठी रणरागिणीशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मते मांडली.