महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2020, 5:48 PM IST

ETV Bharat / state

नाशिक : प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करावी - भुजबळ

नाशिक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातत कायमस्वरुपी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात यावी, अशा सुचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

cchagan bhujbal
cchagan bhujbal

नाशिक - जिल्ह्यातील तालुकास्तरावर खाटांची संख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यात कायमस्वरुपी ऑक्सिजन सेंटर निर्मिती करण्यात यावी,अशा सुचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

रविवारी (दि.2जुलै) दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित महाविद्यालयाच्या सभागृहात दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ या तालुक्यांची कोरोना आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार डॉ. भारती पवार, आमदार नितीन पवार, श्रीराम शेटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, उपसभापती इंद्रजित गावित, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांताधिकारी संदीप आहेर, यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करुन कोविड बाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात यावी. रुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार करुन लक्ष ठेवण्यात यावे. प्रत्येक तालुक्यात गावनिहाय तपासणी मोहीम राबविण्यात यावी. लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी उद्योग व कंपन्या सुरू ठेवाव्या लागणार आहेत. अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी हळू हळू पाऊले उचलावी लागत आहेत. उद्योग क्षेत्रात होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गास रोखण्याच्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे दररोज स्क्रिनिंग करावे. कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आढळलेल्या रुग्णांची माहिती प्रशासनाला द्यावी. रुग्णांची माहिती लपविण्यात येऊ नये, याबाबत कंपन्या व उद्योगांना सूचना देण्यात याव्यात. रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात. दिंडोरीमध्ये तात्काळ सेंट्रल ऑक्सिजनची सोय सुरू करण्यात यावी, असेही निदेश पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले आहेत.

मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगून भुजबळ म्हणाले. पर्जन्यमान कमी असल्याने जिल्ह्यात सध्या पाणी टंचाईची परिस्थिती असल्याने त्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनासोबतच जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे सध्या पाणी टंचाईचे मोठे सावट आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अधिक लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून या योजनेत अधिक नागरिकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील असून कोविडची परिस्थिती सुधारल्यांनातर यावर प्राधान्याने निर्णय घेण्यात येईल. तालुका रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यात समन्वय राहण्यासाठी कॉल सेंटर किंवा हेल्प लाईनचा उपयोग करावा, अशाही सुचना यावेळी भुजबळ यांनी दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details