नाशिक -नाशिक वन विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 300 हुन अधिक बिबटे असून जिल्ह्यात बिबट्यांना राहण्यासाठी पोषक वातावरण असल्याने संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शेतीलगत राहणाऱ्या वस्तीत बिबट्यांचे मनुष्यावर हल्ले वाढत असल्याने नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. वन विभागाच्या एका सर्वेक्षणानुसार ही आकडेवारी समोर आली आहे.
अध्यात्मिक, धार्मिक, द्राक्ष नगरी, कृषिप्रधान जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्याने आता बिबट्यांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळखू होऊ पाहत आहे. वन विभागाच्या ( Forest Department ) एका सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यात 300 हुन अधिक बिबटे ( More than 300 leopards in Nashik district ) असल्याचे समोर आले आहे. येथे बिबट्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एका सर्वेक्षणात वर्षाला अंदाजे बिबट्याकडून मानवावर 25 ते 30 हल्ले होतात. तर शिकारीसाठी बिबट्याकडून मानव वस्तीतील पाळीव प्राण्यांवर दोनशे हुन अधिक हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. वर्षाला वेगवेगळ्या अपघात 50 ते 60 बिबट्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट :नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.