महाराष्ट्र

maharashtra

ईटीव्ही भारत विषेश : निर्यातबंदीनंतरही कांदा खातोय 'भाव'

By

Published : Sep 30, 2020, 3:41 PM IST

Updated : Sep 30, 2020, 4:30 PM IST

केंद्र सरकारने कांद्याचे भाव स्थिर रहावे, यासाठी तातडीने निर्यातबंदीचा निर्णय घेत ग्राहकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता निर्यातबंदीनंतरही नाशिकच्या बाजार समितीमध्ये कांदा तीन ते पाच हजार क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा किरकोळ बाजारात 50 रुपये किलो दराने ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.

कांदा
कांदा

नाशिक - जिल्हा हा कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. नाशिकमधून दरवर्षी लाखो टन कांदा निर्यात होत असतो. यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी तातडीने निर्यातबंदीचा निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होत ठिकठिकाणी आंदोलन करून निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली. मात्र, असे असले तरी आज (दि. 30 सप्टें.) नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांदा हा 3 ते 5 हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. निर्यातबंदीपूर्वी हा भाव दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल इतका होता.

आढावा घेताना प्रतिनिधी
  • ... आणखी वाढू शकतो कांद्याचा भाव

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सध्या कांदा चाळीत 25 ते 30 टक्के कांदा शिल्लक असून यातील बहुतांश कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे. मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वाढले आहे. अशात सप्टेंबर महिन्यात येणारा लाल कांदाही अतिपावसामुळे खराब झाला असून हा कांदा अद्याप बाजारात दाखल झाला नसल्याने उन्हाळी कांद्याचे भाव वाढले आहे. पुढील दीड ते दोन महिने कांद्याचे भाव अधिक वाढू शकतात, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

  • निर्यात बंदी करून काय साध्य झालं?

सरकारने कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तातडीने कांद्याची निर्यात ॉबंदी केली. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांकडे साठवूण ठेवलेला कांदा अत्यपल्प प्रमाणत असल्याने बहुतांशी कांदा खराब झाला आहे. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली असून कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे कांद्या निर्यातबंदी करुन काय साध्य झाले, असा सवाल व्यापारी व शेतकरी करत आहेत.

  • टाळेबंदीच्या काळात आम्ही कवडी मोल भावात कांदा विकला

कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळातील एप्रिल, मे व जून या महिन्यात कांद्याला मागणी नसल्याने कांदा 500 ते 600 रुपये अशा किरकोळ दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. अशात शेतकऱ्यांना एक क्विंटल कांदा उत्पादन करून तो बाजार आणण्यासाठी किमान 1700 ते 1800 रुपये प्रति क्विंटल खर्च येत असतो. अशातच टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन उत्पादन खर्च देखील निघाला नव्हता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता काही शेतकऱ्यांना थोडे पैसे जास्त मिळत असले तरी, यातून मागील नुकसाची काही प्रमाणत भरपाई निघत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

  • लाल कांद्याला उशीर झाला

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात लाल कांदा बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना उन्हाळी कांदा आणि लाल कांदा असा पर्याय मिळत असल्याने कांद्याचे भाव स्थिर राहतात. मात्र, यंदाच्या वर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने येथील कांद्याची लागवड लांबणीवर गेली. त्यामुळे सप्टेंबरमध्ये येणारा लाल कांद्याला यंदा उशीर झाला आहे. त्यामुळेच जोपर्यंत लाल कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत कांदा भाव खाणार हे नक्की.

हेही वाचा -भगूर भागातील दुभाजकावर आढळला शॅमेलिऑन जातीचा दुर्मीळ सरडा

Last Updated : Sep 30, 2020, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details