नाशिक - राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यात राज्यातील 1 कोटी 52 लाख 52 हजार 4 शिधापत्रिकाधारकांना 74 लाख 84 हजार 10 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 33 लाख 84 हजार 40 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून मे मध्ये सुमारे 20 लाख 68 हजार 596 क्विंटल गहू, 15 लाख 88 हजार 972 क्विंटल तांदूळ, तर 22 हजार 10 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे.
स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 4 लाख 43 हजार 624 शिधापत्रिकाधारकांनी मे मध्ये ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 ते 31 मे पर्यंत या योजनेतून 1 कोटी 34 लाख 69 हजार 22 रेशनकार्डवर मोफत तांदूळ वाटप केले आहे.