नाशिक-दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गटातील पांडाणे येथील तलाठी कार्यालयाची गेल्या सहा वर्षांपासून पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना विविध आवश्यक कागदपत्रासाठी वणी (ता. दिंडोरी) येथे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
सहा वर्षांपासून दिंडोरी तलाठी कार्यालय बंद हेही वाचा-केंद्र सरकार व्यवसायाला संधी देत नाही - रोहित पवार
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतदिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील तलाठी कार्यालय बांधण्यात आले होते. परंतु, सहा वर्षांपूर्वी या तलाठी कार्यालयात वणी सापुतारा रस्त्यावरून जाणारा ट्रक घुसला आणि यामध्ये तलाठी कार्यालयाचे नुकसान झाले होते. त्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी कार्यालयाचे फोटो काढून आपण त्वरीत कामाला सुरुवात करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु, गेल्या सहा वर्षांपासून या तलाठी कार्यालयाची आठवण महसूल यंत्रणेला येत नसावी. महसूल विभागाचे अधिकारी कुठे बसतात याची माहीती वरिष्ठांना नसावी का?, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
पांडाणे येथील तलाठी कार्यालयासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, ते न्यायालयीन बाब म्हणून प्रशासनाने वारंवार हात झटकून दिल्याचे ग्रामस्थानी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील खासदार भारती पवार व दिंडोरी पेठचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी स्वतः लक्ष घालून त्वरीत तलाठी कार्यालय दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.