नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या नंदुरबारमधील महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह मिठात पुरून ठेवला. न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका प्रशासनासमोर मांडली. मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होऊ तिचा खून झाला असतानाही पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे. अखेर प्रशासनातर्फे घटनास्थळी जाऊन पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
बलात्कार करून खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप( Relatives allege rape and murder ) विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेवुन गेले. यानंतर मुलीने नातलगाला आलेल्या फोनमध्ये तिच्यासोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगितले. ते मारुन टाकतील असे मृत पीडितेने सांगितले. काही काळातच तिने एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगूनदेखील मृत पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिच्या आत्महत्येचा बनाव (Faking suicide) रचण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.