नंदुरबार- कोल्हापूर येथील पोटनिवडणूक भाजपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चुरशीची ( Election Results ) होती. या निवडणूक प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रचार सभेत निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर मी हिमालयात निघून जाईल, अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली होती. पण, निकाल आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला. भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी जनतेला दिलेला शब्द इतक्या लवकर फिरवले, याचे आश्चर्य वाटले. त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. गुजरातमधून एका लग्न कार्यक्रमाहून परतत असतांना त्यांनी आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अध्यक्षांच्या घरी भेट दिली यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
...त्यामुळे मतदारांनी भाजपला नाकारले - कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचा झालेला विजय हा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून महत्वाचा आणि राजकारणाची भावी दिशा ठरवणारा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात. हे यातून दिसून आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज खडसेंनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत हिंदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. भाजप हा हिंदुत्वाचा वापर राजकारण आणि निवडणुकांपुरता करतो त्यामुळेच त्यांना मतदारांनी नाकारल्याचे मत खडसेंनी व्यक्त केले आहे.