महाराष्ट्र

maharashtra

जिल्ह्यातील कोरोना उद्रेकाला जिल्हाधिकारी जबाबदार; खासदार हीना गावितांचा आरोप

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाने आणि शासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नंदुरबारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळत असून अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीला जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप खासदार हीना गावित यांनी केला आहे.

By

Published : Apr 13, 2021, 10:47 AM IST

Published : Apr 13, 2021, 10:47 AM IST

Heena Gavit allegations on Dr. Rajendra Bharud
हीना गावित जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आरोप

नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. अडीच हजार रेमडेसीवीर इंजेक्शन असताना सामान्य नागरिकांना ते दिले गेले नाही. यामुळेच कोरोना रूग्णांचा मृत्यूदर वाढला आहे. या मृत्यूंना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हेच जबाबदार असल्याचा आरोप खासदार डॉ. हीना गावित यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात राज्यासह केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार हीना गावितांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत

जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घेतली पत्रकार परिषद -

नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. हीना गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, भाजप जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खासदारांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खासदारांनी केले जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप -

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे. अनेक रूग्णांचे हाल होत आहे. राज्य सरकारकडुन उपाय योजनांसंदर्भात पत्र प्राप्त होवूनही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे गांभीर्याने उपाययोजना करत नाहीत. ऑक्सिजन बेडसह रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रूग्णांचा ऑक्सिजन बेडसह रेमडेसीवीर अभावी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील वाढत्या मृत्यू दराला जिल्हाधिकारीच जबाबदार आहेत. प्रशासनाला मिळालेले रेमडेसीवीर इंजेक्शन कोविड रूग्णांना देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी देऊन देखील जिल्हाधिकार्‍यांनी तो पुरवठा केलेला नाही. त्यामुळे अद्यापही रूग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे कडक लॉकडाऊनची मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नाही, असे आरोप डॉ. हीना गावित यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केले.

जिल्ह्यात लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण असल्याचा अंदाज -

जिल्ह्यात सध्या एक लाख व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचा अंदाज आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांची तपासणी झालेली नाही. अनेक गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण असूनही काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. जिल्ह्यात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण होण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे जबाबदार आहेत. त्यांच्या ढिसाळ कार्यपध्दतीविरोधात मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याचे डॉ. हीना गावित म्हणाल्या.

रूग्णालयांऐवजी सेवाभावी संस्थेला इंजेक्शन दिल्याचा आरोप -

नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रूग्णांसाठी प्राप्त झालेले रेमडेसीवीर इंजेक्शन कोविड रूग्णांना वाटप करणे गरजेचे आहे. परंतु, एका पत्राच्या आधारावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी एका सेवाभावी संस्थेला एक हजार इंजेक्शन दिले. यामुळे रूग्णालयातील रूग्ण इंजेक्शनपासून वंचित राहिले. शहरातील एका रूग्णालयाने रेमडेसीवीर इंजेक्शन देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र, त्यांनी त्या रूग्णालयाला इंजेक्शन दिले नाही. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी सूचना करूनही जिल्हाधिकारी त्यांची अंमलबजावणी करत नाही, असे डॉ. हिना गावित यांनी सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांची कार्यपद्धती चुकीची - डॉ. अभिजीत मोरे

नंदुरबार जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच चिंतादायी बनला आहे. ही परिस्थिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झाली आहे. रूग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रूग्णांवर योग्य आणि वेळेवर उपचार होत नसल्याने मृत्यूदर वाढला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.

इंजेक्शन वाटपाची सर्व पक्षीयांची मागणी -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे जिल्ह्यातील अनेक रूग्ण बाधित होत आहे. जिल्ह्यातील कोविड रूग्णालयांना रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी बैठकीत केली होती. त्यावेळी जिल्हा रूग्णालयाकडे 2 हजार 500 इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली होती. हे इंजेक्शन रूग्णालयांना देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या होत्या. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी अद्यापपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सकांना कोविड रूग्णांना इंजेक्शन पुरवठा करण्याचे सांगितले नाही. रूग्णालयांंना त्वरित इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. हीना गावित, माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details